थोडंसं हलकं होऊया...हलकं फुलकं या सदरातील लेख क्रमांक १


नववर्षात ' हलकंफूलकं' या सदरातून आपल्याशी संवाद साधणार आहे.

लेख - थोडंसं हलकं होऊया...

मार्च महिना अखेर होता मी मुंबईहून पुण्यास काही ऑफिस कामानिमित्त दुपारी निघालो होतो. बस प्रवासं खंडाळा घाटातून सुरु होता. खिडकीतून निसर्ग न्याहळत होतो, सृष्टी दिव्य रूप धारण करत होती. मनात विचार आला अशा उष्ण हवेत शुष्क झाडांना हिरवी पालवी कशी येते ? हा काय चमत्कार आहे ? विचार चक्र सुरु राहील -वसंत ऋतूचे आगमन होतं तसं पानगळ होऊन झाडांना पालवी फुटते. पानगळ म्हणजे काय तर ज्याची आवश्यकता नाही ते निसर्ग टाकून देतो व झाडे हलकी होतात पुन्हा पालवी फुटते, ताजीतवानी होतात. माझं कविमन जाग झालं- इथं हलक होणं म्हणजेच एक वेगळी आनंददायी अनुभूती घेणं - वर्षा ऋतूत जेव्हा पाऊस बरसतो त्यावेळी आकाश हलक होत असतं, खरंच किती काळ ते ढगांना धरून बसलेल असतं ना, शिल्पकार ज्यावेळी दगडातून मूर्ती घडवतो तो जडत्वाला हलकं करत असतो , वडील ज्यावेळी मुलाला खांद्यावर घेऊन,  डोकी वर बसवून जग दाखवित असतात त्यावेळी ते स्वतः हलके होत असतात, आपली अपत्ये यशस्वी  विद्या  अभ्यास करून उत्तम अर्थार्जन करू लागतात त्यावेळी आई वडील कृतार्थ होतात, हायसे होतात. आपल्या लाडक्या मुलीचं लग्न ठरत आणि आई वडील आपली जबाबदारी संपणार म्हणून हलक होण्याचा अनुभव घेऊ पहातात. प्रत्यक्ष मुलीला सासरी धाडण्याचा क्षण येतो आणि आई वडील आणि  मुलीस गहिवरून येत. आसू आणि हासू अशी ही जड अंतकरणाने निरोप घेण्याची वेळ आणि एका मोठ्या जबाबदारीतून मुक्त होत हलक होणं असा हा सीमारेषेवरील क्षण, एखाद्या भाजीवाल्याला त्याच्या भाजीची टोपलीला हात घेऊन उचलायला ज्यावेळी आपण मदत करता तेव्हा पाटीचे ओझे तर कमी होतेच व आपणही हलके होत असतो, एखाद्या अंध माणसास, वृद्ध माणसासं, हात पायास प्लास्टर असलेल्या माणसास रस्ता क्रॉस करुन द्यायला आपण मदत करतो त्यावेळी तुमचा आयुष्यरूप रस्त्यावरील प्रवासही सुकर होत असतो. आपल्या जीवनात असे प्रसंग हर घडी येत असतात. सजग,निर्मळ मानाने असे क्षण टिपणं, आपलेसं करून घेण हिच हलके होण्याची साधना आहे,सहज योग आहे. जमेल तेव्हा श्रमदान,अन्नदान आणि आनंदवन सारख्या संस्थाना देणगी देवून पुंजी हलकी करून आनंदमयी होऊन जायचं.आपण माणूस असल्याने जीवन वाटेवर चालताना चुका होणारच, अपराध घडणारच परंतु त्यांची आठवण विसरून, मैत्री आणि नात्यातील गैरसमज झाल्यास लगेच मरगळ झटकून हलक व्हायचं त्यांना Luggage नाही बनू द्याचं. अश्रूंना वाट करून हास्याच्या कारंज्यात नहायचं. लहान मूल सकाळी झोपेतून उठत तेव्हा त्या गादीला खड्डा पडतो सार कालच विसरून मूल हलक झालेलं असत तशी नवीन दिवसाची सुरुवात करायची. प्रेयसाकडून श्रेयसाकडे जाण्याची ही वाटचाल आहे हे मनास पटवून द्यायचे. सण साजरे करण्यामागील मूळ हेतू हाच आहे. सन्मार्गाची आठवण आणि सत्प्रवृत्तीची वाढ होण्यासाठीच वेगवेगळ्या सणांची योजना आहे. आपण दररोज शौच मुखमार्जन स्नान करतो म्हणजे शरीरातले जडता टाकून, हलके होतो ताजेतवाने होतो. देवपूजेतील स्नानाने, अभिषेकाने त्या मूर्ती ही हलक्या होतात. अभिषेक, गंध लेपन, पुष्पार्पण आणि आरती यातून मनातील जडत्व जाऊन मन आणि चित्त शुद्धी घडते. मन एकाग्र होते. दिवसारंभ चांगला झाला की सारा दिवस सावधपणे जगता येतो. काया वाचा आणि मन यांची शुद्धी ही सतत करावी लागते. जे त्याज्य आहे ते टाकून द्यायचं आणि जे श्रेयस आहे त्याचा अंगीकार करावयाचा. सायंकाले पठे नित्यं प्रातः काले विशेषतः अशा विविध प्रकारे धर्मग्रंथातून, स्तोत्राच्या शेवटी फलश्रुती सांगितलेली असते. आयुष्यातील काना ,मात्रा, वेलांट्या अकार, ऊकार म्हणजेच आळस, अहंगंड अहंकार मत्सर इत्यादी दुर्गुण होत. हे जडत्वाचे अलंकार दररोज प्रयत्नपूर्वक स्वतः मधून काढून ठेवायचा प्रयत्न करायला हवा म्हणजे मग आपण हलके बनू आणि जीवन संगीताचा आनंद घेऊ शकू. हलक होण्याच्या अशा ह्या विविध रंगछटा रंगविताना “‘चला लोणावळा आला गाडी १५ मिनिटे थांबेल" असा बस वाहकाने आवाज दिला; गाडी थांबली आणि विचार चक्रही. चहा घेण्यास बस मधून उतरलो,पाय मोकळे झाले आणि हलकं वाटलं.

टिप्पण्या

विजय रणसिंग म्हणाले…
योग्य संकल्पना. आपण कितीतरी अनावश्यक ओझी घेऊन जगत असतो. हलकं फुलकं जीवन जगण्यासाठी त्यांना वेळीच दूर करणे योग्य मनाची मरगळ कमी होऊन पुन्हा नव्याने प्रफुल्लित होते
सुंदर विचार श्री लेले साहेब 👌🏻

विजय
Nandkishor Shridhar Lele म्हणाले…
आपण नेहमीच माझे लेख बारकाईने वाचून आपला सुंदर अभिप्राय देता त्यामुळे नवीन ऊर्जा मिळते खूप खूप धन्यवाद विजयजी.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पोपट दादा ...पोपट दादा ...

आचार्य अत्रे यांची आज जयंती त्यानिमित्ताने

वारी वारी पंढरी...कसा असतो वारकरी