मन हो रामरंगि रंगले...













मन हो रामरंगि रंगले 
रामरंगि रंगले मन 
आत्मरंगी रंगले मन

विश्वरंगि रंगले 
चरणि नेत्र गुंतले 
भृंग अंबुजांतले
 भवतरंग भंगले 
 अंतरंग दंगले 

 प्रभू श्रीरामचंद्र यांचे अयोध्या नगरीमध्ये गुढ्या तोरणे उभारून स्वागत करण्यात आले हा दिन म्हणजे गुढीपाडवा. त्या अगोदर असतो तो रंगोत्सव. काही दिवसापूर्वीच रंगोत्सवानिमित्त विविध माध्यमातून रंगाचा उल्लेख असलेली गाणी ऐकू येत होती परंतु जे गाणं कुठेही ऐकायला मिळालं नाही पण मनामध्ये सारखं रुंजी घालू लागले ते गाणं म्हणजे मन हो राम रंगी रंगले. स्वरभास्कर पंडित भीमसेनजी यांनी गायलेले हे अतिशय भावपूर्ण गाणं आहे. प्रथम मला हा अभंग आहे असं वाटत होतं. परंतु ही भक्तीरचना' आठवणीतल्या गाणी' या संकेतस्थळावर शोध घेतला असता प्रतिभावंत संगीतकार श्री गोविंदराव टेंबे यांनी संगीत दिलेली व स्वतः त्यांचीच ही काव्य गीत रचना हे कळलं. रंग या विविध शब्दांचा उल्लेख असलेले विविध शब्द या गीतात अतिशय समर्पकरीत्या योजिलेले आहेत. त्याने मनावर अनेक वर्ष पकड घेतलेली आहे. मात्र आज हे गीत आकळलं .

या गीताचे रसग्रहण करावं असं वाटलं ते खाली देत आहे.

 आदरणीय गोविंदराव टेंबे यांनी लिहिलेल्या 'तुलसीदास' या नाटकातील ही भक्ती रचना आहे .फक्त सतरा शब्द आणि दोन कडवी असे गीत गाताना भीमसेनजींनी सारा प्राण यात ओतला असून सुरुवातीच्या आलापीतच ते आपल्याला हातात बोट धरून रामाच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊन त्याच्या सन्मुख उभे करतात. आणि हळूहळू आपल्या दैवी सुरातून साऱ्या श्रोत्यांना स्वर तल्लीन करत त्यांच्या अंतचक्षूसमोर रामराया उभा करतात. सगुणातून निर्गुणाकडे घेऊन जातात कारण श्रोतेजन गाण्यात रंगून डोलू लागतात .

 रामरंगी, आत्मरंगी, विश्वरंगी ,भवतरंग आणि अंतरंग अशा पाच शब्दांचा सुरेख वापर करून ही रचना बांधली गेलेली आहे. रंगले, गुंतले, अंबुजातले (अंबुज म्हणजे पद्म -कमळ) भंगले ,दंगले अशी यमकं यामध्ये गुंफलेली आहेत.

रामाचे नाम ओठी नित्य घेत असता त्याची सवय लावून भक्त राम नामात रंगून गेला आहे. रामनामाशी अनुसंधान घडले आहे. मन आणि आत्मा एकरूप झाले आहेत.-साऱ्या विश्वातले चैतन्य आपल्यात समाविष्ट झाले आहे अशी त्याला अनुभूती येते आहे. असा अर्थ पहिल्या कडव्यातून जाणवतो.
परंतु हे सर्व कसे घडले हा चमत्कार कसा झाला याचा उलगडा पुढील कडव्यात आहे. सामान्यतः काव्यरचनेमध्ये मनाला विस्मयीत करणारी कलाटणी ही शेवटच्या कडव्यात अथवा ओळीत असते परंतु इथे त्याचा क्रम बदलला आहे . हे ही या गीताचे एक आगळे वैशिष्ट्य आहे. राम नाम जप करताना डोळ्यासमोर रामाच्या मूर्तीचे ध्यान आहे आणि एक शरणागतीची भावना निर्माण झाली आहे .सारा विश्व पसारा यात राम भरून राहिला आहे (माझे तुझे हे विसरून ) जळी स्थळी काष्ठी पाषाणी राम भरून राहीला आहे तोची एक जगंनियता असा दृढ विश्वास भक्ताला झाला आहे. आणि तो ही कसा तर ज्याप्रमाणे भृंग हा कमळामध्ये मधाच्या ओढीने एकेक पाकळी पार करत गाभ्याशी जायचा प्रयत्न करतो आणि तेथेच गुंतून पडतो स्वतःच पूर्ण समर्पण तिथं घडतं .भृंग अंबुजातूंनी हा उच्चार दीर्घ करुन त्याचं तिथं तल्लीन होणं भीमसेनजी स्वरातून दाखवितात 'भवतरंग भंगले' या ओळीतून हे सारं व्यक्त होत. सर्व अहंकार गळून पडला आहे .सर्व षडरिपू यांचा अस्त झाला आहे; अंतरंगी फक्त रामनाम आता उमटलं आहे आणि त्यातच भक्त दंगून गेला आहे. जीव आणि शिव यांची गाठ पडली आहे.

 इथं जे गीतकाराला आणि संगीतकार याला सांगायचं आहे ते आदरणीय भीमसेनजीनी आपल्या समर्थ स्वरातून साकारलं आहे. ऐकणारे सारे यांना(व्यष्टी आणि समष्टी) रामरूप होणं याचं प्रत्यंतर येतं. 


   



























टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

ध्यासपंथी गोखले काकू

'घडी घडी घडी चरण तुझे आठवती रामा' गीत रसग्रहण

पहाटेच्या या प्रहरी- रसग्रहण