क्षण स्वाक्षरीचा... प्रख्यात कवी आणि गीतकार शंकर वैद्य
श्री सरस्वती देवी प्रसन्न
क्षण स्वाक्षरीचा... प्रख्यात कवी आणि गीतकार शंकर वैद्य यांची स्वाक्षरी घेण्याचा
साहित्य वाचनाच्या छंदामुळे अनेक मान्यवर साहित्यिक मंडळींना प्रत्यक्ष भेटण्याचे, त्यांना ऐकण्याचे योग माझ्या आयुष्यात येत गेले. असाच एक योग म्हणजे बँकेमध्ये २००६ साली वाशी- नवी मुंबई मध्ये नोकरीस असताना कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे आयोजित कवी "बी - ( श्री नारायण मुरलीधर गुप्ते)" यांच्या कवितांच्यावरील एका विशेष कार्यक्रमासाठी उपस्थित राह्यचं भाग्य मला लाभलं. श्री शंकर वैद्य हे कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात नामवंत कवी अरुण म्हात्रे, सतीश केळुसकर अशोक बागवे आदी मंडळीचा सहभाग होता. कवी बी यांच्या अनेक उत्तम कविता-चांफा बोलेना चांफा चालेना… चांफा या अत्यंत गाजलेल्या कवितेसह माझी कन्या, गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या आदी कवितांचा वाचनात समावेश होता असं आठवतं . त्या कवितांची गुण वैशिष्ट्ये ही सांगितली गेल्याने कार्यक्रमाची रंगत वाढत गेली . अधून मधून मंद हास्य करत वैद्य सर कवितेतील विशेष भावलेला अर्थ याविषयी टिप्पणी करत असत. "फुलांची ओंजळ" हा कवी बी यांच्या काव्यसंग्रहास आचार्य अत्रे यांनी जवळ जवळ चाळीस पानांची प्रस्तावना लिहिली आहे . अत्रे यांनी कवी बी यांना 'कवींचे कवी' असे गौरवानं म्हटलं आहे आणि ते नुसते Poet नसून Poet and Philosopher होते असंही सांगितलं आहे. अशी खूप माहिती त्या दिवशी मला कळाली. सरांनी "जगद्गुरु संत तुकाराम यांना का म्हणता वाणी? ज्यांनी सांगितली वेदवाणी" असं कार्यक्रमात सांगितलं . ध्वनी यंत्रणा ठीक नसल्यानं नक्की संदर्भ ऐकू आला नाही. एकंदरीत कार्यक्रम ऐकून मी भारावून गेलो खरा पण वरील वाक्य मात्र माझ्या मनात कोरलं गेलं. कार्यक्रम संपल्यावर काव्यरसिक व श्रोते यांचा गराडा सरांभोवती पडला. मी थोडे थांबून सरांना सही देण्याची विनंती केली ,सर मंद हसले आणि शुभेच्छासह सही दिली. मी सरांना आदरपूर्वक नमस्कार केला. असा हा मंतरलेला क्षण आज १५ जून त्यांच्या जयंतीनिमित्त पुन्हा ताजा झाला.
टिप्पण्या
श्रीकृष्ण गोविंद देशपांडे